यशासाठी विचारांची स्पष्टता महत्वाची....



राहूल रेखावार (AIR-15)


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात १५ वा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलेल्या नांदेडच्या राहूल रेखावारची महान्यूजमधील ‘साक्षात्कार ’ सदरासाठी मुलाखत घ्यायची होती. पूर्वकल्पना देऊन संमती मिळविल्यानंतर त्याचं आनंदनगरमधील घर गाठलं. सकाळी ११ ची वेळ होती आणि राहूलही तयार होताच. आम्हाला पाहताच त्याने विनम्रपणे नमस्कार केला आणि लगेचच ट्रेमध्ये पाण्याचे चार ग्लास घेऊन आला. एक आयएएस अधिकारी एवढे आदरातिथ्य करतो यावर क्षणभर विश्वास बसला नाही. संस्कार आणि ज्ञान मिळाल्यामुळे व्यक्तीमत्व कसं घडत याच मूर्तीमंत उदाहरण समोर होतं. या व्यक्तीमत्वाच्या प्रभावाखालून क्षणभर बाहेर पडत मुलाखतीस सुरुवात केली. राहूलची महान्यूजसाठी घेतलेली ही मुलाखत.

युपीएससी परीक्षेचे आकर्षण केंव्हा व का वाटले असा प्रश्न करताच राहूल बोलका झाला. इयत्ता नववीत असतानाच निबंध व इतर स्पर्धात मी भाग घेत असे शिष्यवृत्ती परीक्षा, एमटीएस, एनटीएस आणि नवोदय परीक्षाही उत्तीण केल्या. वडील अशोकराव रेखावार याना मात्र, राहूलने सिव्हील सर्व्हीसमध्ये जावे असे सारखे वाटायचे. राहूललाही तो विचार पटला. आता तर आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याने एक व्यासपीठ मिळाले. गरिबांना परिणामकारकरित्या मदत करण्याची संधी मिळाली असे तो म्हणाला.

मेहनतीवर राहूलचा प्रचंड विश्वास आहे. युपीएससी ही केवळ बुध्दीमत्तेची परीक्षा आहे, असे नव्हे तर व्यक्तीमत्व विकासाला या परीक्षेत असाधारण महत्व आहे. व्यक्तीमत्व विकासासाठी प्रत्येकाने मेहनत घेणे आवश्यक आहे. या व्यक्तीमत्वाच्या जोडीला आत्मविश्वास असेल तर चांगला अधिकारी म्हणून काम सुरु करता येते. तिचे निश्चित चीज होईल हे लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे. आज काय केले, का केले आणि उद्या काय करणार या बाबींचे सातत्याने चिंतन करावे. त्यामुळे जीवनात अनेक क्षेत्रात यशस्वी होता येते, अशी त्याची धारणा आहे.

प्रशासनाचा अनुभव घेण्यासाठी बिटस् पिलानी येथे त्याने अनेक विद्यार्थी मंडळामध्ये भाग घेतला. चार हजार विद्यार्थी संख्या असलेल्या तेथील मेस सिस्टीमच्या प्रशासकीय समितीत त्याने एक वर्ष काम केले. राष्ट्रीय सेवा योजनामध्ये समाज कार्याचा अनुभव घेतला. समाजिक उद्योगशिलतेचा अनुभव येण्यासाठी नोकरी करत त्याने सेक्टर नोएडा, दिल्ली येथे एका झोपडपट्टीत एक रात्र शाळा सुरु केली. दिवसा काम करणारे अशिक्षीत मुले-मुली तेथे लेखन, वाचन शिकायचे. हे काम वर्षभर केल्यावर स्वत:च्या आयएएसच्या ध्यासाविषयी त्याची खात्री पटली. ऑक्टोबर २००६ मध्ये राहूलने नोकरीचा राजीनामा देऊन युपीएएसी पूर्णवेळ परीक्षेची तयारी सुरु केली.

बोलण्याच्या ओघात राहूलने लोकराज्य मासिकाचा आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला, हे मासिक त्यातील शासनाचे धोरण, योजना, यशवंतांची मनोगते, एमपीएससी विषयक मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी याबाबतच्या माहितीमुळे स्पर्धेत उतरलेल्या विद्यार्थ्यासाठी दिवसेदिवस निश्चित उपयुक्त ठरत आहे.


दहावीच्या बोर्डात ९१ टक्के गुण मिळवून नववा आलेल्या राहूलने एवढी मोठी झेप घेतली हे त्याच्या तोंडून ऐकताना आश्चर्य वाटले. प्रतिभेला संधी मिळताच तिचे कसे सोने होते हे मुलाखतीतून बाहेर येत होते. उत्तरोत्तर मुलाखत रंगत जात होती. १२ वी परीक्षेत ९६.३३ टक्के गुण घेऊन बोर्डात तो दुसरा व राज्यात दहावा आला. त्यानंतर बीटस् पिलानी येथून इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर पदवी घेतली आणि विविध क्षेत्रातले ज्ञान प्राप्त केले. मध्यंतरी दिल्ली येथे नोकरीही केली. धडपडय़ा राहूलला गरिबांची सेवा करायची मनोमन इच्छा होती. त्यासाठी आयएएस होण्याचा त्याने दृढ निर्धार करुन त्या दिशने प्रयत्न सुरु केले. भौतिकशास्त्र व भूगोल हे विषय निवडले. कधी तो मित्रासोबत हार्मोनिकामध्ये तल्लीन व्हायचा. पक्षाच्या डोळ्याप्रमाणे त्याला केवळ केंद्रीय आयोगाची परीक्षा दिसत होती. यशाचे गमक सांगताना आयएएस साठी गुण जास्त असावेतच हे तो मान्य करत नाही. सरासरीपेक्षा थोडय़ा जास्त बुध्दिमत्तेचेही विद्यार्थी अथक परिश्रम करुन ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात असा त्याचा दावा आहे.

जितका शक्य तेवढा वेळ त्याने अभ्यासाठी दिला. शांत वातावरण व प्रसन्न मन असताना त्याला केंव्हाही अभ्यासात गोडी वाटायची. कोचींग क्लासचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे तो मान्य करतो. अभ्यासाला दिशा मिळावी. प्रत्येक पाठ कसा, किती व कुठपर्यंत अभ्यासायचा, उत्तरे मुद्देसूद कशी लिहायची यासाठी मार्गदर्शन केंद्राची गरज असते, असे त्याचे प्राजंळ मत आहे. शिवाय तयार नोटस् मिळतात व त्या सर्वांमुळे परीक्षेची तयारी सहज होते. एक-दोन वर्षे वाचतात. यासाठीच त्याने दिल्ली येथे सामान्य अध्ययनासाठी वाजिराम आणि रवि, भूगोल विषयासाठी ए.एल.एस. तर भौतिकशास्त्र विषयाच्या तयारीसाठी वाजपेयी सरांचे व डी.आय.ए.एस. चे क्लास केले. परीक्षेच्या तयारीसाठी त्याला एस. सुंदरराजन, उदीत प्रकाश राय, गुलाटी सुप्रितसिंग, अभिजीन अग्रवाल, हे सिनियर्स आणि रविंद्रन कपुरीया, वर्मा, मनोचा, ऍटम, शशांक, जो.जो. मॅथ्यूज , डॉ. गिरीधारी, डॉ. व्यंकटेश वरलू, श्री व सौ भानोत (बीटस् पिलानी), अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी), अरुण बोंगीरवार (माजी मुख्य सचिव ), डॉ. श्रीकर परदेशी (जिल्हाधिकारी, नांदेड), श्रावण हर्डीकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड ), निपूण विनायक (आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका ), जी. श्रीकांत (आयएएस), दहिया सर (असिस्टंट एसपी, नांदेड ), लक्ष्मीकांत पाटील (डीवायएसपी, नांदेड) अशा अनेक तज्ज्ञ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या सहकार्यामुळे मला हे यश मिळविता आले अशी त्याने कबुली दिली.

राहूलचे वडील भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी पदार्थविज्ञान शास्त्राची पुस्तके, संदर्भग्रंथ, नियतकालिके वेळोवेळी उपलब्ध करुन दिली. स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थीची भेट घडवून दिली. तेव्हा परीक्षार्थींशी झालेल्या चर्चेतून अनेक क्लृप्त्या मिळाल्या. त्याच्या नीता व अमिता या बहिणी अभियंता असून त्या अमेरिकेत राहतात. दोघी बहिणी तसेच आई सौ. शोभाताई रेखावार यांनी त्याला अवघड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मानसिक बळ व प्रेरणा दिली. नांदेडसारख्या मागासलेल्या स्वत:च्या जिल्ह्यात सेवेची संधी मिळाली तर कसे कार्य कराल या प्रश्नाला राहूलने मार्मिक उत्तर दिले. रोजगार, पाणी, साक्षरता याबरोबरच लोकांना योजनांची माहिती नसणे हे जिल्ह्याचे प्रश्न आहेत. सेवेची संधी मिळाल्यावर ते सोडविण्यावर माझा भर राहील असे तो विश्वासाने सांगत होता.

प्रथम कृषिचे उत्पादन वाढवून त्यावर आधारित उद्योग शहरात उभारणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे खेडय़ासोबत शहरेही संपन्न होतील. पंजाब, हरियानामध्ये हे चित्र पाहायला मिळते. संपूर्ण भारतात अशी परिस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे, असे देशाच्या विकासाबाबत प्रतिक्रिया देताना रेखावार म्हणाला.

आयएएस परीक्षा ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यावर घेण्यात येते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर जागरुक राहणे गरजेचे आहे, असे त्याने आग्रही मत मांडले.

नव्या होतकरु तरुणांना यशाचा कानमंत्र देताना राहूल म्हणतो, कोणीही स्वत:स कमी लेखू नये. मराठवाडय़ाचा तरुण बुध्दिमान आहे. परिश्रम करण्यात तो कुठे कमी पडत नाही. मात्र, योग्य मार्गदर्शनाच्या संधी त्याला मिळण्याची गरज आहे. निसर्गदत्त बुध्दीला परिश्रमाची जोड दिल्यास यश दूर राहत नाही असे त्याला वाटते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचा आवाका मोठा आहे. शॉर्टकटचा कदापि वापर करु नये. मुलाखतीत काहीही विचारले जाते व त्यासाठी सखोल अभ्यास असावा लागतो. आपण जास्त हुशार नसला तर विज्ञान शाखेऐवजी कला विभागाचे विषय निवडावेत. मनाची एकाग्रता करुन अभ्यास करावा. एकंदरीत, यश प्राप्तीसाठी परिश्रम हाच एकमेव मार्ग आहे, असे त्याला आवर्जून सूचवायचे होते, हे लक्षात येते.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream